
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले
नवी दिल्ली ः भारतीय पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी संघाने इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने फ्रान्सचा पराभव केला आणि या स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले.
ऋषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे या त्रिकुटाने शानदार कामगिरी करत विजेतेपदाच्या सामन्यात फ्रान्सचा २३५-२३३ अशा फरकाने पराभव केला. अंतिम सामन्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि तुर्कीविरुद्धही प्रभावी विजय नोंदवले होते.
ज्योती-ऋषभच्या मिश्र संघाला रौप्य पदक
यापूर्वी, ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या मिश्र संघ जोडीला अंतिम सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध १५५-१५७ असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु त्यानंतर २३ वर्षीय ऋषभने सैनी आणि प्रथमेशसह पुरुषांच्या कंपाऊंड संघाचे विजेतेपद जिंकले. तिसऱ्या सेटनंतर १७६-१७६ असा बरोबरी झाला, परंतु दुसऱ्या मानांकित भारतीय संघाने निर्णायक फेरीत ५९ गुण मिळवले तर फ्रान्सला फक्त ५७ गुण मिळवता आले. अशा प्रकारे भारताने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.