
बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभवाचा मोठा धक्का
शारजाह ः टी २० क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच नेपाळ आणि वेस्ट इंडिज आमनेसामने आले. शारजाह क्रिकेट ग्राउंडवर हा सामना झाला. या मैदानावर नेपाळने वेस्ट इंडिजचा १९ धावांनी पराभव करत मोठा धक्का दिला.
या विजयामुळे नेपाळला तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली. वेस्ट इंडिज अकील हुसेनच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने २० षटकांत ८ गडी गमावून १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिज २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १२९ धावाच करू शकला.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या नेपाळची सामन्याची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकापासून संघाच्या विकेट पडू लागल्या. नेपाळला पहिला धक्का बसला जेव्हा कुशल भुर्तेल ८ धावांवर ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर यष्टीरक्षक-फलंदाज आशिफ शेख ३ धावा काढून बाद झाला. रोहित पौडेल आणि कुशल मल्ला यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. कुशल मल्ला २१ चेंडूत ३० धावांवर बाद झाला, त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. कर्णधार पौडेलने ३५ चेंडूत ३८ धावा केल्या. दीपेंद्र सिंग ऐरीनेही १९ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ बळी घेतले. नवीन बिदाईशीने २९ धावांत ३ बळी घेतले.
वेस्ट इंडिजचे फलंदाज फ्लॉप
वेस्ट इंडिजसारख्या संघासाठी १४९ धावांचे लक्ष्य हे मोठे लक्ष्य नव्हते, परंतु विंडीज ते साध्य करण्यात अपयशी ठरले. या सामन्यात सर्व फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. सलामीवीर काइल मेयर्स ५ आणि अमीर जांगू १९ धावांवर बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत अकीम ऑगस्टेने ७ चेंडूत १५ धावा केल्या. त्यांच्या पाठोपाठ ज्वेल अँड्र्यूने १६, तर नवीन बिदासीने २५ चेंडूत २२ धावा केल्या. कर्णधार अकील हुसेनने ९ चेंडूत २८ धावा केल्या, त्यात एक चौकार आणि दोन षटकार मारले. नेपाळी गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. नेपाळकडून कुशल भुर्तेलने १७ धावांत २ बळी घेतले.