भारतीय संघाचा सलग दुसरा विजय 

  • By admin
  • October 5, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

पाकिस्तान संघाचा दुसरा पराभव, क्रांती गौड, दीप्ती शर्माची प्रभावी गोलंदाजी 

कोलंबो ः भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघाचा तब्बल ८८ धावांनी पराभव करुन महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. सिद्रा अमीनची ८१ धावांची खेळी निष्फळ ठरली. क्रांती गौडची प्रभावी गोलंदाजी लक्षवेधक ठरली. 

पाकिस्तान संघाने ४३ षटकात सर्वबाद १५९ धावा काढल्या. सिद्रा अमीन हिने सर्वाधिक ८१ धावा काढल्या. तिने नऊ चौकार व एक षटकार मारला. नतालिया परवेझ (३३), सिद्रा नवाज (१४) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला. अन्य फलंदाज धावांचा दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाहीत. 

भारतीय संघाकडून क्रांती गौड हिने प्रभावी गोलंदाजी केली. तिने २० धावांत तीन विकेट घेऊन विजयाचा पाया भक्कम केला. दीप्ती शर्मा हिने ४५ धावांत तीन गडी बाद करुन विजयाला हातभार लावला. स्नेह राणा हिने ३८ धावांत दोन बळी घेतले. 

भारत सर्वबाद २४७

पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव ५० षटकांत २४७ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताची फलंदाजी खराब होती आणि एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तिने ६५ चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला.

हरलीन व्यतिरिक्त, जेमिमा रॉड्रिग्जने ३२, प्रतीका रावलने ३१, स्मृती मानधना २३, दीप्ती शर्मा २५, स्नेह राणा २०, कर्णधार हरमनप्रीत कौर १९, क्रांती गौर ८ आणि श्रीचरनी १ धावा केल्या. रिचा घोष २० चेंडूत नाबाद ३५ धावा करत राहिली, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. पाकिस्तानकडून डायना बेगने चार विकेट घेतल्या, तर सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रमीन शमीम आणि नाशरा संधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मॅच रेफ्रीची चूक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला विश्वचषक सामन्याच्या टॉस दरम्यान, मॅच रेफ्री शांद्रे फ्रिट्झ यांनी चूक केली. या चुकीमुळे पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना यांना टॉसचा विजेता घोषित करण्यात आले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणे फेकले आणि सनाने “टेल्स” म्हटले, परंतु फ्रिट्झने ते चुकीचे ऐकले आणि ते “हेड्स” असे चुकीचे लिहिले. त्यानंतर प्रेझेंटर मेल जोन्स यांनीही तिला टॉसचा विजेता घोषित केले. नाणे “डोके वर” पडले, परंतु पाकिस्तानला टॉसचा विजेता मानले गेले आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि पाकिस्तानी कर्णधाराशी बोलण्यासाठी जोन्सकडे गेली. तिने सनाशी हस्तांदोलन केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *