महाराष्ट्राचा तायक्वांदो क्षेत्रातील सुवर्ण अध्याय 

  • By admin
  • October 23, 2025
  • 0
  • 104 Views
Spread the love

राज्यातील सहा खेळाडूंची तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुंबई ः भारतीय तायक्वांदोच्या इतिहासात महाराष्ट्राने आज एक नवे पर्व लिहिले आहे! राज्यातील सहा प्रतिभावान खेळाडूंची प्रतिष्ठेच्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५, बहरीनसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना आहे, कारण राज्याने प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने युवा तायक्वांदोपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवले आहेत.

खेळाडूंचा अभिमानास्पद यशाचा प्रवास

राष्ट्रीय पातळीवरील कठोर निवड प्रक्रियेनंतर निवड झालेल्या खेळाडूंमध्ये प्रिशा शेट्टी (सातारा), धनश्री पवार (पुणे), किसारा थानोजी साई रेड्डी (अहिल्यानगर), अक्षरा शानबाग (मुंबई), आर्यन जोशी (पुणे) आणि समर्थ गायकवाड (मुंबई उपनगर) यांचा समावेश आहे.

या सर्वांनी सातत्यपूर्ण मेहनत, अचूक तंत्र आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. विशेष म्हणजे, किसारा थानोजी साई रेड्डी ही खेळाडू क्यूरोगी (स्पर्धात्मक लढत) आणि पूमसे (प्रात्यक्षिक) या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा करणार असून, तिची बहुमुखी प्रतिभा देशाच्या आशा अधिक बळकट करते. उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि वैज्ञानिक तयारीगेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), लखनऊ येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात कठोर सराव केला आहे.

राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली आधुनिक तंत्रज्ञान, फिटनेस ट्रॅकिंग, पोषण मार्गदर्शन आणि मनोवैज्ञानिक तयारीच्या साहाय्याने या युवा खेळाडूंनी स्वतःला आशियाई स्पर्धांसाठी सिद्ध केले आहे.या प्रशिक्षणात ऑलिम्पिक स्तरावरील मानके, स्पर्धात्मक ताण नियंत्रण, आणि रणनीती विश्लेषण यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे भारतीय संघातील महाराष्ट्राचे खेळाडू आशियाई पातळीवर सशक्त कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत.

सरकारचा सर्वसमावेशक पाठिंबा

या सर्व खेळाडूंच्या प्रवास, निवास, भोजन, उपकरणे आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने उचलला आहे. हा उपक्रम ‘खेलो इंडिया’ आणि आंतरराष्ट्रीय तयारी कार्यक्रम अंतर्गत राबवण्यात आला असून, देशातील क्रीडा प्रतिभांना जागतिक मंचावर पोहोचवण्याच्या सरकारच्या दृढ संकल्पाचे प्रतीक आहे.अलीकडेच भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि साई यांच्या वतीने नवी दिल्ली येथे या निवड झालेल्या खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील खेळाडूंनी सातत्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले.

महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षकांचा राष्ट्रीय सन्मान

खेळाडूंसोबतच महाराष्ट्रातील दोन अनुभवी प्रशिक्षकांचीही निवड भारताच्या प्रशिक्षक मंडळात झाली आहे. प्रणव निवंगुणे (पुणे) आणि राजन सिंग (मुंबई उपनगर) हे पूमसे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबत बहरीनला रवाना होणार आहेत. या दोन्ही प्रशिक्षकांनी लखनऊ येथील राष्ट्रीय शिबिरात तांत्रिक आणि मानसिक तयारीत खेळाडूंना आकार दिला असून, त्यांच्या योगदानामुळे भारताच्या प्रशिक्षण प्रणालीला बळकटी मिळाली आहे.

नामदेव शिरगावकर यांच्या नेतृत्वात तायक्वांदोला नवी दिशा

हे ऐतिहासिक यश हे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे फळ आहे. त्यांच्या गतिशील नेतृत्वाखाली इंडिया तायक्वांदोला भारत सरकारची अधिकृत मान्यता मिळाली असून, संघटना आता वर्ल्ड तायक्वांदो सोबत ऑलिम्पिक चार्टरनुसार संलग्न आहे.नामदेव शिरगावकर यांच्या पारदर्शक कार्यशैली, तांत्रिक विकासावर दिलेला भर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिबिरे आयोजित करण्याच्या उपक्रमामुळे, भारत आता जगातील शीर्ष २० तायक्वांदो राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

महाराष्ट्र संघटनेचे योगदान आणि आधारस्तंभ

या ऐतिहासिक कामगिरीत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ताम) चे मोठे योगदान आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सरचिटणीस अमजदखान (गफार) पठाण, आणि खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी एकजुटीने महाराष्ट्रात तायक्वांदोचा पाया मजबूत केला आहे. कार्यकारिणीतील सदस्य तुषार आवटे, सुरेश चौधरी, घनश्याम सानप, प्रमोद दौंडे, पद्माकर कांबळे, नारायण वाघाडे यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे संघटनेने प्रशासनात पारदर्शकता, व्यावसायिकता आणि खेळाडू केंद्रित कार्यपद्धती टिकवून ठेवली आहे.

महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी क्षण

या यशामुळे महाराष्ट्राचा तायक्वांदो समुदाय एकवटला असून, राज्यभरात अभिमान आणि प्रेरणेची लाट पसरली आहे. हे यश केवळ सहा खेळाडूंचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षक, अधिकारी आणि क्रीडा प्रेमींच्या परिश्रमाचे फलित आहे.तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने सर्व निवड झालेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे युवा तायक्वांदोपटू आता बहरीनमध्ये तिरंगा फडकवून भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील, असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *