मी काही महिनेच कर्णधार : रोहित शर्मा

  • By admin
  • January 12, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

‘नवा कर्णधार मिळाल्यानंतर संघाचे नेतृत्व सोडेल’

मुंबई : न्यूझीलंडपाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटी मालिकेत भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या भारतीय संघातील स्थान आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय संघाच्या कामगिरीबाबत आढावा बैठकीत रोहित शर्माने या विषयावर थेट मत व्यक्त करत आगामी काही महिने कर्णधारपद भूषवण्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा रोहितने व्यक्त केली. 

मुंबईत भारतीय संघाच्या कामगिरीबाबत एक आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना काही प्रश्न विचारले. यावेळी रोहित शर्माने स्पष्ट केले की पुढचा कर्णधार सापडल्यानंतर तो भारतीय संघाचे कर्णधारपद सोडेल.’

एका सूत्राच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, बैठकीदरम्यान रोहितने सांगितले की, तो आणखी काही महिने भारतीय संघाचा कर्णधार राहू इच्छितो आणि तोपर्यंत बोर्डाने नवीन कर्णधाराचा शोध सुरू ठेवावा. रोहितने असेही म्हटले आहे की बोर्ड नवीन कर्णधार म्हणून ज्याची निवड करेल त्याला तो पूर्ण पाठिंबा देईल. बैठकीत जसप्रीत बुमराहला कर्णधार करण्याबाबतही चर्चा झाली. तथापि, एका सदस्याने सांगितले की बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे त्याच्या कामाचा ताण सांभाळणे महत्त्वाचे असेल. त्यावर इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की यावर नंतर चर्चा केली जाईल.

रोहित आणि विराटच्या फॉर्मवर चर्चा

या बैठकीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्मवरही चर्चा झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मैदानावर अधिक मेहनत करण्यास सांगण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीवरून त्याच्या कारकिर्दीचा निर्णय होईल. या बैठकीत असाही निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत फिजिओचा अहवाल, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी परवानगी दिली नाही तोपर्यंत कोणताही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही. जर हे लोक म्हणतात की खेळाडू कामाच्या ताणामुळे खेळू इच्छित नाही, तरच त्या खेळाडूला सूट मिळेल.

या बैठकीत प्रामुख्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील भारतीय संघाच्या अपयशावर बरीच चर्चा झाली. याशिवाय संघात कोणत्या सुधारणा करता येतील यावरही चर्चा झाली. बोर्डाच्या या आढावा बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया, प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *