
भूतान संघावर ३७ गुणांनी मात, सुयश गरगटे सामन्याचा मानकरी
बाळासाहेब तोरसकर

नवी दिल्ली : पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने देखील महिला संघापाठोपाठ दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात भारताने भूतान संघावर ७१-३४ (हाफ टाइम ३२-१८) असा ३७ गुणांनी धमाकेदार विजयाची नोंद केली व उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. सुयश गरगटेला या सामन्यात सामन्याचा मानकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सामन्याच्या पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत ३२ गुणांची आघाडी घेतली. भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या “स्काय डायव्हिंग” कौशल्याने संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकली. चपळाई आणि संघटन कौशल्याचा उत्तम नमुना पाहायला मिळाला.
दुसऱ्या डावात बचावात अफलातून कामगिरी
दुसऱ्या डावात भारताने आपले अफलातून संरक्षण कौशल्य दाखवत भूतानच्या आक्रमणाला दाद दिली नाही. भूतानने वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाच्या रणनीतीमुळे त्यांना फक्त १८ गुण मिळवता आले.
तिसऱ्या डावात पुनश्च आक्रमणाची जादू
तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात पुन्हा जोरदार प्रदर्शन केले. निखिलने अप्रतिम “स्काय डायव्हिंग” कौशल्य दाखवून संघासाठी ३६ गुण मिळवले. भारतीय संघाने उत्कृष्ट समन्वय साधत २८ गुणांची लयलूट केली.
भूतानची निराशाजनक कामगिरी
अंतिम टर्नमध्ये भूतान संघाला त्यांच्या वेळेच्या निम्म्या कालावधीत फक्त ९ गुण मिळवता आले. भारतीय बचावाने त्यांना पुन्हा संधी दिली नाही, आणि सामना ३७ गुणांच्या फरकाने जिंकत भारताने विजयश्री खेचून आणली.