
श्रीलंका संघाचा ६० गुणांनी उडवला धुव्वा, रामजी कश्यप सामन्याचा मानकरी
नवी दिल्ली : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने महिला संघापाठोपाठ गुणांचे शतक करत मोठा विजय साजरा केला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर १००-४० (हाफ टाइम ५८-१८) असा ६० गुणांनी चमकदार विजयाची नोंद केली व उपांत्य फेरीत धडक मारली. रामजी कश्यप, प्रतीक वाईकर, आणि आदित्य गणपुले यांच्या अप्रतिम कामगिरी भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. रामजी कश्यप या सामन्यात सामन्याचा मानकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताच्या दोन्ही संघाची उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी लढत होईल.

पहिल्या टर्नमध्ये श्रीलंकेला एकही गुण मिळवू न देत भारताने वर्चस्व गाजवले. दुसऱ्या टर्नमध्ये श्रीलंकेच्या आक्रमकांनी प्रयत्न केले; अनिकेत पोटे आणि आदित्य गणपुले यांनी मैदान गाजवले. मात्र, भारतीय संघाने मिळवलेली मोठी आघाडी श्रीलंकेसाठी फारशी आव्हानात्मक ठरली नाही.
तिसऱ्या टर्न मध्ये भारताने आक्रमणात गती आणली. शिवा रेड्डी, व्ही. सुब्रमणी, आणि वजीर प्रतीक वाईकर यांनी अप्रतिम स्कायडाईव्ह व पोल डाईव्ह करत श्रीलंकेला दबावाखाली ठेवले. तिसऱ्या टर्नच्या शेवटी भारतीय संघाने १०० गुणांचा पल्ला गाठून सामना जवळपास जिंकला होता.
शेवटच्या टप्प्यात पाबनी सबर, अनिकेत पोटे, आणि शिवा रेड्डी यांनी संयमाने खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्याचा अंतिम गुणफलक १००-४० असा होता. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.