
शुभम शर्माचे ४ महत्त्वपूर्ण बळी; कर्णधार प्रतीक शर्माचे नाबाद शतक
जळगाव ः जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रुप स्पोर्ट्स क्लबच्या संघावर तीन विकेटने विजय प्राप्त करून प्रतिष्ठित अशा द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. यात जैन इरिगेशनच्या शुभम शर्माने ४ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या तर कर्णधार प्रतीक शर्मा याने नाबाद शतकी खेळी साकारली.
‘सी’ डिव्हिजनच्या या विजेतेपदामुळे जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘ब’ संघ आता पुढील वर्षी (२०२५-२६) ‘बी’ डिव्हिजन मध्ये पदोन्नित झाला आहे. या विजयाबरोबर जैन इरिगेशन संघाने मुंबईतील टाइम्स व कार्पोरेट चषकावर आपले नाव नोंदवून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या विजयी संघातील खेळाडू व प्रशिक्षक यांचे जैन इरिगेशन संघाचे संयोजक मयंक पारिख, अरविंद देशपांडे तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले आहे.
मुंबई पोलिस जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध रिलायन्स ग्रृप स्पोर्ट्स क्लब यांच्यात रंगला. या सामन्याची नाणेफेक जैन इरिगेशन व संघाचा कर्णधार प्रतीक यादव याने जिंकून रिलायन्स ग्रुप स्पोर्ट्स क्लब फलंदाजासाठी पाचरण केले. रिलायन्स स्पोर्ट्स क्लब संघा चांगली सुरुवात करत वेदांत पाटील ५४ धावा, शुभम पुजार्थि २५ धावा फटकावल्या. वेदांत खांबे नाबाद ४७ आणि जगदीश जाधव नाबाद ४१ या जोडीने आठव्या गडासाठी नाबाद ८० धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी करीत आपल्या संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. जैन इरिगेशन संघाने मंदगती गोलंदाजी केल्याने याचा फटका त्यांना बसला. रिलायन्स ग्रुप संघाला तब्बल ४० दंडात्मक धावा त्यामुळे बहाल केल्या व अशा प्रकारे रिलायन्स ग्रुप स्पोर्ट्स क्लब यांनी ४३ षटकात सात गडी गमावत २५२ धावा करून जैन इरिगेशन ‘ब’ संघासमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले. जैन इरिगेशनतर्फे गोलंदाजीमध्ये शिवम यादव व अमित गावंडे प्रत्येक १ विकेट तर शुभम शर्मा याने ४ विकेट घेत रिलायन्स ग्रुपचा डाव गुंडाळला.
निर्धारीत ४५ षटकांत २५३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या जैन इरिगेशनच्या ‘ब’ संघाची सुरवात अडखडत झाली. जैन इरिगेशन संघाचा कर्णधार प्रतीक यादव याने कर्णधारास साजेशी अशी नाबाद ११० धावांची खेळी करत संघाला विजयी पथावर नेले. त्यात त्याने ७ चौकार व २ षटकारांची आतिषबाजी केली. त्याला शिवम यादव ४०, आरुष पाटणकर २६ व ऋषिकेश गोरे नाबाद २६ यांनी चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ६४ धावांची भागिदारी करत संघाला विजयी केले. २५३ धावांचे लक्ष्य ४४.४ षटकांत पूर्ण करून अंतिम सामन्यात दिमाखदारपणे विजय प्राप्त केला.