
खेलो इंडिया पॅरा गेम्स; बॅडमिंटनमध्ये तीन पदके निश्चित
नवी दिल्ली : दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत बॅडमिंटनमध्ये दोन पदके निश्चित केली. अंतिम फेरीत धडक दिलेल्या आरती पाटील आणि सुकांत कदमकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जिमनॅस्टिक हॉलमध्ये उपांत्य फेरीत २८ वर्षीय आरती पाटीलने आपली मैत्रीण हरियाणाची लतिका ठाकूर हिचे आव्हान २१-१८, २१-७ ने परतवून लावले. आता अंतिम फेरीत तिच्यासमोर भारताची अव्वल खेळाडू असलेली पॅरालिम्पिकपटू नित्याश्री हिचे आव्हान असेल.
खेलो इंडिया पॅरा गेम्समधील आरतीचे हे सलग दुसरे पदक असेल. पुनीत बालन ग्रुपचे आर्थिक पाठबळ लाभलेली आरती अजय रावत, अक्षय गजबे, वरद गजबे, राहुल पाटील आणि संयोगिता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
लताताई उमरेकरला कांस्यपदक
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील क्रीडा संचलनालयात मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आलेल्या नांदेडच्या ३५ वर्षीय लता ताई उमरेकर हिने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक मिळवले. उपांत्य फेरीत तिला नित्याश्रीने २१-६, २१-४ असे सहजपणे पराभूत केले. पदकाचा रंग बदलला असला तर अधिक आनंद झाला असता. पुरेसा सराव नसतानाही आपल्या संघाला कांस्यपदक जिंकून देऊ शकले, याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया लताताई हिने व्यक्त केली.

सुकांत कदम अंतिम फेरीत
बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला आंतरराष्ट्रीय खेळाडू सुकांत कदमने फायनलमध्ये धडक दिली आहे. उपांत्य फेरीत सुकांतने हरियाणाच्या योगेशचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. अंतिम फेरीत त्याच्यासमोर तामिळनाडूच्या नवीनकुमारचे आव्हान असेल.